Friday, October 31, 2014

काफिर ! ( भाग एक )


असलम शेठचा नुकताच डोळा लागला होता ..बाहेर एकदम कुत्र्यांचा कालवा झाला ...तारस्वरात काहीतरी अघटीत घडत असल्याची बोंब ठोकत होती कुत्री ..त्यांच्या कर्कश्य भुंकण्याने असलम शेठची झोप चाळवली ..बंगल्याचे दार उघडून ते अंगणात आले ..अंगणात लावलेल्या बल्बच्या प्रकाशात त्यांना एक जण बंगल्याच्या गेट वर चढलेला दिसला ..." आ गया नालायक " असे स्वतःशी पुटपुटत ते पुढे झाले ..त्यांना पाहून उस्मान क्षणभर थबकला ..मग गेटवरून उडी मारून आत आला ..मान खाली घालून उभा राहिला .." तो अब अपनेही घर मी चोरो जैसे घुसनेकी बारी आ गई जनाब ? " असलमशेठ च्या या प्रश्नार्थक उपहासावर उस्मान कडे काहीच उत्तर नव्हते ..तो नुसताच शुंभासारखा उभा राहिला ..दारातून शेठ बाजूला होण्याची वाट पाहत ..." आप घर में रातभर नही आते तो भी कोई फर्क नही पडता .." शेठच्या या बोलण्याने दुखावल्या सारखा असलम त्यांच्याकडे रोखून पाहू लागला ...तितक्यात मागून लगबगीने फातिमा बेगम बाहेर आल्या ..बाप लेकांची पुन्हा खडाजंगी होणार हे ओळखून सारवा सारव करू लागल्या .." बेटा समय पे घर आया करो ..हम सब इंतजार करते रहेते है आपका ..चलो अंदर चलकर खान खावो " असे म्हणून त्यांनी उस्मानला हात धरून घरात आणले ..हताशपणे असलम शेठ मागे फिरले ..पुन्हा बेडवर येवून झोपेची आराधना करू लागले ..बाहेर सगळ्या पंचक्रोशीत दबदबा असलेले असलम शेठ उस्मान प्रकरणात हतबल झाले होते ..उस्मान त्यांचे तिसरे अपत्य ..पहिल्या दोन मुलांनंतर सुमारे दहा वर्षांनी झालेले शेंडाफळ ..लहानपणापासून खूप लाडात वाढलेला ..पढाईत खूप हुशार ..बोलण्यात चतुर ..दिसायला देखणा उस्मान गेल्या चार वर्षांपासून मात्र बिघडला होता ..घरातील अनियमितता वाढली होती ..वारंवार पैसे मागणे ..रात्री बेरात्री घरी येणे ..रागावल्यास डोळ्याला डोळा भिडवून उलट उत्तरे देणे ..हे बदल असलम शेठची चिंता वाढवणारे होते ..त्यांनी फातिमा बेगमला या बद्दल पूर्वीच सावध केले होते ..त्याचे फालतू लाड करू नकोस असे बजावले होते ..मात्र उस्मानची अम्मी पुत्रप्रेमाने आंधळी झाली होती ..सगळेच आपल्या उस्मानला रागावतात ..हिडीसफिडीस करतात ..म्हणून तो असा वागतो असे त्यांना वाटे ..
असलम शेठ म्हणजे गावातले बडे प्रस्थ होते ..पिढ्या नु पिढ्या चालत आलेली जमीनदारी ..घरात पैश्यांची काही कमतरता नाही ...नोकरचाकर ..मान मरातब ..घरातील धार्मिक वातावरण ..उस्मान सोडून सगळे जण पाच वेळा नमाज पढून " अल्ला " ची करुणा भाकणारे...असलम शेठचे वय झाले तसे मोठ्या दोघांनी शेतीवाडीत लक्ष घातले होते ..अब्बुंची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती .. गेल्या दोन चार वर्षात हट्टी आणि जिद्दी असणारा उस्मान बिघडलाय हे सर्वप्रथम मोठ्या भावाच्या हुसेनच्या कानावर आले होते ..हुसेनच्या मित्राने त्याला उस्मान गावातील बियरबार मध्ये दिसला असे सांगितले..त्याच दिवशी हुसेनने उस्मानला फैलावर घेतले होते ..कुराण शरीफ मध्ये ' शराब ' हराम आहे असे म्हंटले आहे हे त्याला सांगितले ..उम्मानने तेवढ्यापुरते मोठ्या भावाचे ऐकून घेतले ..मात्र त्याच्या वर्तनात काही बदल झाला नाही ..तेव्हाच हुसेनने घरात बजावले होते ..याला अजिबात पैसे द्यायचे नाहीत ..हा बाहेर पैसे उडवतो ..हराम गोष्टींवर पैसा खर्च करतो वगैरे ..परंतु फातिमा बेगम चोरून लपून उस्मानला पैसे पुरवत असत .घरात इतकी समृद्धी असताना ..पोराला दोनचार रुपयांसाठी कोणाकडे हात पसरव लागू नये असे त्यांना मनापासून वाटे ..शराब हराम आहे हे वारंवार सांगितल्यावर एकदा हुसेन ने उस्मानला ' अल्ला ' चा वास्ता दिला ..तेव्हा काही दिवस बरे गेले ..नंतर उस्मान शराब ऐवजी गांजाच्या अड्ड्याकडे दिसला असे हुसेनला समजले ..पुन्हा हुसेन लहान भावाला रागावला ..तेव्हा " कुराणशरीफ में सिर्फ शराब हराम लिखा है ..गांजा नही " असे विचित्र उत्तर दिले होते उस्मानने .." सभी प्रकार की नशा हराम मानी जाती है " असे समजावून देखील उस्मान काही सुधारत नव्हता ..एकदा तर दोन्ही मोठ्या भावांनी मिळून उस्मानला गुरासारखा बडवला होता ..घरात दोन दिवस बांधून ठेवला होता ..त्यावेळी फातिमा बेगम आजारी पडल्या ..त्यांनीही दोन दिवस अन्न ग्रहण केले नव्हते ..शेवटी अम्मी पुढे हतबल झाल्याने दोन्ही भावांनी उस्मानला रागावणे सोडले होते ..ते दोघेही आपापला संसार घेवून वरच्या मजल्यावर राहायला गेले ..खालच्या मजल्यावर असलमशेठ ..फातिमा आणि उस्मान असे तिघेच राहू लागलेले ..असलम शेठनी दोन तीन वेळा उस्मानला समज देण्याचा प्रयत्न केला ..उस्मान उलट उत्तरे देतो .आपला मान ठेवत नाही हे लक्षात आल्यावर ते व्यथित झाले होते ..अलीकडे उस्मान ब्राऊन शुगरच्या नादी लागलाय असे ही त्यांच्या कानावर आले होते ...
एकदा प्रेमाने बोलून त्यांनी उस्मानला गळ घातली..व्यसनमुक्ती केंद्रात भरती होण्याचा आग्रह केला ..त्याला गोडी गुलाबीने मुंबईला नेले ..तेथील नामवंत व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले..आता उस्मान सुधारेल अशी त्यांना आशा होती ..तेथे तीन महिन्यांचा कोर्स होता ..परंतु पंधरा दिवसांनी सगळे कुटुंब उस्मानला भेटायला गेले तेव्हा..उस्मानने रडारड केली..घरी घेवून चला असा हट्ट केला ..शपथा घेतल्या ..फातिमा बेगमचे दिल पाघळले ..उस्मानला घरी घेवून जावू असा त्यांनी देखील आग्रह केला ..तेथील समुपदेशकांनी फातिमा बेगमला खूप समजावले..याला पूर्ण उपचार घेवू द्या म्हणून ..परंतु शेवटी फातिमा बेगमच्या हट्टापुढे कोणाचेही काहीच चालले नाही ..एकतर फातिमा बेगमना हल्ली ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला होता ..त्यांच्या मनाविरुद्ध झाले तर ब्लड प्रेशर वाढून त्यांच्या जीवाला धोका होईल या भीतीने ..उस्मानला घरी आणावे लागले होते..घरी आल्यावर चार पाच दिवसातच उस्मान पुन्हा बाहेर जावू लागला होता ...त्याच मित्रांमध्ये जावून ब्राऊन शुगर ओढू लागला होता ..आता काही केल्या तो व्यसनमुक्ती केंद्रात जायला तयार होत नव्ह्ता ..त्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याच्या आड फातिमा बेगमचे पुत्रपेम येत होते .
( बाकी पुढील भागात )

Wednesday, October 29, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग तीन )


रखमी एकूण पाच घरी काम करी ..सगळीकडे धुणे आणि भांडी ..आठवड्यातून एकदा फरश्या पुसणे हा बिनपगारी ओव्हरटाईम..आज उद्विग्न अवस्थेत होती ती ..कामाच्या ठिकाणी पोरांना घेवून जायला तिला आवडत नसे ..कारण तेथे पोरे उगाच मालकिणीच्या घरातील वस्तून हात लावत असत ..त्यावेळी त्यांच्या नजरेतील अप्रूप तिला आवडत नसे..तसेच घरातील माणसे देखील सारखी पोरांना इथे नको हात लावू ..अरे ते तुटेल ..फुटेल ..असे रागवत असत ..एक दोन ठिकाणी तर मालकिणीने तिला सरळच सांगितले होते की पोरांना इथे आणू नकोस..आम्हाला उगाच लक्ष ठेवावे लागते त्यांच्या कडे ..एकदा राजाने एका घरातला चेंडू उचलून आणला होता खेळता खेळता ..त्य दिवशी तिने राजाला मार मार मारले .दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नाही..असे न सांगता न विचारता वस्तू उचलली तर ती चोरी असते हे त्याला चांगलेच उमगले..तेव्हापासून राजाने स्वतःहूनच तिच्या सोबत जाणें नाकारले होते..आज मात्र नाईलाजाने तिला दोन्ही पोरे घेवून निघावे लागले होते कामावर ..प्रत्येक घरी दिवाळीची धूम होती चांगलीच ..मुलांना नवीन कपडे ..नवीन वस्तू ..घरात गोडधोड ..पाहुणे रावळे..रखमीचे काम देखील वाढलेले ..भांडी घासता घासता रखमीला राहवले नाही.. तिने हळूच घरच्या मालकिणी कडे आगावू पैसे मागितले ..दिवाळी आहे पोरांना फाटके आणायचे आहेत हे सांगितले ..आधीच रखमीच्या अंगावर पैसे होते त्यांचे ..पोरांना फटाके आणायचे आहेत म्हंटल्यावर मालकिणीने तोंड कसेनुसे केले ..म्हणाली " अग किती प्रदूषण होते त्या फटाक्यांनी....नुसता पैश्यांचा धूर सगळीकडे ..तुम्हा लोकांना कधी समजणार निसर्गाचे महत्व ? " रखमीने नुसतीच लाचारीने मान डोलावली ..कालच त्या मालकिणीच्या पोरांनी रखमीला आम्ही या वेळी पाच हजार रुपयांचे फटके आणलेत हे सांगितलेले आठवले रखमीला ..पण ती काहीच बोलली नाही ..शेवटी मालकिणीने तिला दोनशे रुपये दिले ..वर सल्ला दिला उगाच फटाके आणू नका याचे त्यापेक्षा काहीतरी गोड धोड खा ..संध्याकाळी फटाके फोडताना राजाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाचे स्वप्न पाहत रखमीने मान हलवून होकार दिला ..
दुपारी घरी आल्यावर संध्याकाळी फटाके घेवू म्हणून तिने ते पैसे साखरेच्या पुडीत लपवले ..हल्ली सदा पैश्यांसाठी सगळे घर धुंडाळत असे ..शेवटी तिच्या कपड्यात हात घालून लपवलेले पैसे देखील काढून नेत असे..हे आठवून तिने या वेळी पैसे नीट नवीन जागेत लपवले होते ..सदाची दिवाळी सकाळपासूनच सुरु झालेली ..पिवून मस्त होऊन तो बाजूच्या दारुड्या मित्राशी काहीतरी बडबड करत बसला होता ..रखमी तावातावाने पोरांना घेवून कामावर गेली तेव्हाच त्याने ताडले होते की आता ही नक्की पोराच्या फटाक्यासाठी आगावू पैसे घेवून येणार ..त्याने तिच्या नकळत तिला पैसे लपवताना हेरले ..आणि तिचे लक्ष नसताना ते पैसे काढून पुन्हा बाहेर सटकला ..संध्याकाळी जेव्हा रखमीला पैसे गायब झाल्याचे समजले तेव्हा तिचा तिळपापड झाला ..रागाने वेडीपिशी झाली ती ..इकडे राजा आणि चिंगीची फटाके हवेत म्हणून कटकट सुरूच होती .सदाला शिव्या घालत ती या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधात होती ..गेली चाळीस वर्षे या दारूने तीला जगणे नकोसे केलेले ..आधी बाप नंतर नवरा ..सदा आला की त्याला जाब विचारायचा..आज सगळा हिशोब करायचा हे ठरवत होती ..बाहेर अंधारून आलेले ..फटाक्यांचे आवाज ..हर्षोल्हास..कोलाहल ..राजा आणि चिंगी आसुसलेल्या डोळ्यांनी ते पाहत होते ..मधून मधून रखमीकडे फटाक्यांचा लकडा लावत होते ..अगतिक रखमी शेवटी त्यांना समजावून थकली ...दोन धपाटे घातले दोघांना ..मग रडत्या पोरांना तिनेही रडतच उराशी कवटाळले .. झोपडीत तेवणाऱ्या चिमणीच्या प्रकाशात तिघेही स्तब्ध बसून राहिले .. हलणाऱ्या चिमणीच्या ज्योतीबरोबर त्याच्या सावल्या भयाण होऊन हलत होत्या ..
कोणाला तरी शिव्या घालत ..बडबडत अडखळत सदा घरात शिरला तेव्हा रखमी त्याच्या अंगावर ओरडली ..वाट्टोळ केलस मुडद्या तू माह्यावालं..पोराच्या फटाक्यांचे पैसे पण नेलेस त्या दारूच्या मढयावर घालायला ..किडे पडतील तुला ..सदा पण तिला शिव्या देवू लागला ..तिच्या अंगावर चालून गेला ..पोरांची रडारड सुरु झाली ..बाहेरच्या फटक्यांच्या आवाजात यांचा कोलाहल ..आज रखमीच्या अंगात दहा हत्तीचे बळ चढलेले ..त्यांच्या झटापटीत धक्का लागून चिमणी विझली ..अंधारात ओरडण्याचे..धडपडीचे..आवाज ..मग सदाची अस्फुट किंचाळी .. एकदम सगळा कोलाहल शांत झाला ..रखमीने चाचपडत चिमणी लावली ..रक्ताच्या थारोळ्यात सदा निपचित पडला होता ..बाजूलाच झटापटीत रखमीच्या हाती आलेला वरवंटा..रखमी भानावर येवून पोरांना ओढत बाहेर पडली..वाट फुटेल तशी चालत राहिली ..स्टेशनवर समोर असलेल्या गाडीत बसली ..भेदरून पोरे तिला चिटकून बसली होती ..दुसऱ्या दिवशी पंचनाम्याला आलेल्या पोलिसांना सदाच्या दारुड्या मित्राने माहिती पुरवली .. वर्तमान पत्रात बातमी आली .. अनैतिक संबंधातून नवऱ्याच्या खून...नवऱ्याने अनैतिक संबंधांचा राग येवून जाब विचारल्याने रागावून पत्नीने त्याच्या डोक्यात वरवंटा मारून त्याचा खून केला ..आरोपी दोन मुलांसह फरार ..पुढील तपास सुरु आहे .
( समाप्त )

Monday, October 27, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग दोन )


बाप गेल्यावर रखमी सर्वार्थाने एकटी पडली ..तिला इतक्या वर्षात इतर कोणी नातलग माहितीच नव्हते ..लहानपणीच बाप म्हणे दारीद्र्याला वैतागून गाव सोडून मुंबईला निघून आलेला ..मुंबईत राबत ..घाम गाळत..लाचारीने मोठा झालेला..एका गवंड्याच्या हाताखाली गवंडीकाम शिकून तयार झाला .. त्याच गुरुकडून याला दारूचा वसा मिळालेला ..त्याच्याच पोरीशी पाट लावून संसारी झालेला ..इतकीच स्टोरी रखमीला माय कडून समजली होती ..बाप गेल्यावर ती खूप सैरभैर झाली ..दहा दिवस घराबाहेर पडलीच नाही..झोपडपट्टीतल्या शेजारयानीच बापाचे सर्व विधी उरकले ..त्या खर्चासाठी तिने चार घरी धुणेभांड्याचे आगावू पैसे घेवून ..अंगावर कर्ज देखील करून ठेवलेले..बाप जाता जाता आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली टाकून गेला हे लक्षात आल्यावर तिने कंबर कसली कष्ट वाढवले ...बाप गेल्यावर तिला एक जाणवले ..बाप जिवंत असे पर्यंत मर्यादेने वागणारे .आता उघड उघड सलगी करू पाहू लागले ..येता जाता तिची ख्याली खुशाली विचारू लागलेले ..वर काही कमी जास्त झाल्यास मदत करण्याची एका पायावर तयारी असल्याचे सांगू लागले ...ती रहात असलेल्या झोपडपट्टी पासून ते ज्या घरी काम करी तेथील पुरुषांपर्यंत सगळ्यांची तीच तऱ्हा..फक्त तिला भुलवण्याचे मार्ग वेगवेगळे ..तिने मन खंबीर केलेले होते ..कोणत्याही अमिषाला बळी पडायचे नाही ..बाजूला राहत असलेल्या ...अनेक उन्हाळे काढलेल्या..मात्र आता सर्वच दृष्टीने निरुपयोगी ठरलेल्या म्हातारीने तिला सल्ला दिला .." पोरी लवकर एखादा चांगला मुलगा पाहून पाट लावून घे त्याच्याशी..नाहीतर वाऱ्यावर उडालेल्या कागदा सारखे नाचावे लागेल तुला वारं येईल तसे..कसा का असेना शरीराला मालक हवा ..एखाद्या अवघड क्षणी निसर्ग डाव साधेल मग कायमच हरत जाशील ..म्हातारीच्या सल्ला तिच्या मनात रुजला होता ..जाता येता चौकात दिसणाऱ्या सदा वर तिची नजर रेंगाळली ..पार ती नजरेआड होईपर्यंत तो तिला निशब्द पहात असे ..हा बाजूच्या झोपडपट्टीत राहणारा ड्रायव्हर म्हणून काम करतो हे तिला तिच्या मैत्रिणीकडून समजले होते ..एके दिवशी धाडस करून सदाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ..तिने देखील तोंड न वेंगाडता त्याला प्रतिसाद दिला ..
आयुष्यातले धुंद दिवस सुरु झाले ..स्वप्नवत असलेले..जीव ओवाळून टाकावेसे वाटणारे ..याच क्षणांच्या बदल्यात सारे आयुष्य उन्हाळा सहन करण्याची ताकद मिळावी असे मंतरलेले दिवस ...त्याच धुंदीत तिने सदाशी पाट लावून घेतला ..तिच्या झोपडीतील किडूक मिडूक सामान त्याच्या खोपटात सामावले गेले ..कधी नव्हे ते रखमा सिनेमाला जावू लागली ..पहिल्यांदा अंगावर दुकानात जावून विकत घेतलेले नवे कोरे कपडे आले ..असे दोन वर्ष गेल्यावर राजाचा जन्म झाला ..मग वर्ष भरात चिंगी ..मात्र या चिमुकल्यांच्या प्रवेशासोबत झोपडीत अधेमध्ये दारूचा आंबूस वास यायला सुरवात झाली ..रखमीने सदाला सावध केले ..ही दारू संसाराचे वाटोळे करते हा मोलाचा सल्ला दिला ..पण सदाने पुरुषी बेफिकीरीने तो सल्ला धुडकावला ..मग तिने शपथ घातली ..स्वताची ..मग पोरांची ..शपथे नंतर काही दिवस चांगले जात मात्र लवकरच सदाला आपल्याच काय पोरांच्या देखील शपथेची किंमत राहिली नाही हे ती उमगली ..मग तिने राग दर्शविला ..बडबड केली तसे ..सदा देखील प्रत्युत्तर देवू लागला ..एकमेकांची उणी दुणी काढणे सुरु झाले ..सदाच्या रूपाने जणू काही आपला मेलेला बापच परत आलाय की काय असे वाटू लागले ..पुढे पुढे सदा अंगावर हात टाकू लागला ..अगदी लाथा बुक्क्यांनी तुडवी लागला तिला ..सात जन्माची वैरीण असल्यासारखी तिला वागवू लागला ..ती मार खाई तरी देखील त्याला बोलणे सोडत नव्हती ..आपल्या लेकरांचे भविष्य अंधारात आहे हे जाणवून ती भेदरली होती ..कसेही करून दारूला याने सोडचिट्ठी द्यावी म्हणून तिने कोण काय सांगेल ते उपास तापास केले .. नवस बोलली..परंतु सदा दिवसेंदिवस जास्तच बिथरत चालला होता ..हल्ली तर त्याने तिच्या चारीत्र्या वर चिखलफेक करणे सुरु केलेले ..त्याच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाने तिला मळमळल्या सारखे होई म्हणून ती त्याच्यापासून अंतर वाढवू लागली ..तसे तू बाहेर उंडारतेस ..पासली पडतेस..घरचे सोडून बाहेर पोट भर खातेस वगैरे बोलू लागला ..ती कामावर निघाली की उपहासाने हसू लागला ..तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देवू लागला ..तिला वाटले आपल्याला माहेर असते तर किती बरे झाले असते ..किमान रागाने माहेरी जाता आले असते ..पण या दारुनेच तिचे माहेर हिरावले होते ..रडत खडत दिवस चालले होते ..अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत ..पण आपल्या मागे पोरांचे काय हाल होतील या धास्तीने ती ते विचार परतवून लावी ..एकदा तिने भांडी घासता घासता घरच्या मालकिणीला आपली व्यथा सांगितली ..त्या मालकिणीने सरळ पोलिसात जा ..तक्रार कर नवऱ्याची असा सल्ला दिला ..तिला ते प्रशस्त वाटले नाही तरीही एकदा प्रयोग म्हणून ती जवळच्या चौकीत गेली ..तेथे नवरा मारतो ..शिव्या देतो वगैरे सांगितले ..तर हा तुमचा घरगुती मामला आहे ..असे सांगून तिची बोळवण केली गेली ..कोणाच्या तरी सांगण्यावरून ती कौटुंबिक सल्ला केंद्रात गेली ..तेथे आपले रडगाणे गायले ..तेथील बाईने रीतसर तक्रार घेतली ..नवऱ्याला समज देऊ असे सांगून एक पोलीस पाठवला तिच्या सोबत सदाला दम द्यायला ...त्या नंतर दोन दिवस बरे गेले ..नंतर सदा पुन्हा पिवून आला ..या वेळी तर तू धंदा करतेस ..पोलिसांना तंगड्या देतेस ..वगैरे बोलला ..ती तशीच अंधारात पोलीस स्टेशनला गेली ..पोलिसांनी त्याला पकडून नेले ..एक दिवस कोठडीत डांबून ..दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले ..तेथे नवऱ्याने कान पकडले ..सर्वांची माफी मागितली ..त्याला सोडले गेले ..पुन्हा तेच ..
शेवटी आता आपले भोग आहेत हे ..भोगूनच संपवले पाहिजेत या विचाराने ती चूप बसली .. तिला मार खायची सवय पडली ..मात्र निष्पाप पोरांवर सदा हात उचलू लागला तेव्हा ती वाघिणी सारखी चवताळली ..पोरांचे रक्षण करू लागली ..आज सकाळी सकाळी राजाने फटाक्यांची मागणी सुरु केली होती ..सदाच्या पिण्यापायी घरात पैसा थांबत नव्हता ..त्याची नोकरी सुटलेली ..तिच्या धुणी भांड्याचे पैसे तो तिच्याकडून हिसकावून नेई .जेमतेम दोन वेळा पोटभर अन्न मिळत होते .. पोराला फटाके आणू कुठून हे तिला समजत नव्हते ..पोराच्या हट्टाने ती फटाकड्याच्या द्काना पर्यंत जावून आलेली ..चार सुरसु-यांची ची पेटी पन्नास रुपये ..ही किंमत ऐकून परत मागे फिरली ..आता एखाद्या घरी पुन्हा आगावू पैसे मागून किमान पोराला सुरसूरया तरी घेवून देवू असा विचार केला होता तिने ..पण राजाला आताच्या आत्ता फटके हवे होते ..पोर आपल्यामागे मार खाईल या विचाराने ती दोन्ही पोरांना सोबत घेवून कामावर जायला निघाली ..सदा मागे शिव्या देत राहिला..त्याच्याकडे दुर्लक्ष करून..
( बाकी पुढील भागात )

दिवाळीची दैना ! ( भाग एक )


" आमाला बी फटाकडे हवेत " म्हणून पोरांनी दोन दिवसांपासून उच्छाद मांडलेला ..रखमीचा जीव मेटाकुटीस आला होता ..आज तर सकाळधरणं सहा वर्षाच्या राजाने रडारड सुरु केलेली ..मातीत बसकण मारून ' ' फटाकडे पायजे' चा जप ...येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांकडे तो केविलवाण्या नजरेने पाहत ..नाक न डोळे एकाच झटक्यात पुसत ...तो हातपाय मातीत आपटून ..वेगवेगळ्या सुरात बोंबलत होता ..त्याचे रडण्याला दुजोरा म्हणून त्याच्यापेक्षा एक वर्षांनी लहान असलेली चिंगी देखील त्याच्या रडण्याला पाठींबा देत त्याच्याच बाजूला बसून झोपडपट्टीच्या समोर रस्त्यावर लावलेल्या फटाकड्याच्या दुकानाकडे आशाळभूतपणे पाहत बसली होती..." काय बे मादरचोद ..तुला फटाकडे हवेत व्हय रे .." अशी सुरवात करून झोपमोड झालेल्या सदाने लाखोली सुरु केली तसा रखमीचा जीव धस्तावला .." उतरली भाड्याची दारू .." असे मनातल्या मनात म्हणत तिने पदर कमरेला खोवला .. पोराच्या रक्षणास सज्ज झाली ..
सदा काल मध्यरात्री ढोसून आलेला ..आल्या आल्या दमून भागून पोरांना पोटाशी घेवून गाढ झोपलेल्या रखमी वर त्याने हक्काने हात टाकला होता ..उगा जवळ ओढून इकडे तिकडे झोंबू लागला तशी तिने त्याला ' पोर जागी व्हतील ." .असे म्हणत तिरस्काराने दूर ढकलले .." तूला रोज वेगवेगळे लागत असतीन ...छिनाल ..अशी कचकचीत शिवी हासडत त्याने तिच्या पोटात गुद्दा लगावला ..तोंड दाबून ती घुसमटून विव्हळली.. मग मेल्यागत गपगार पडून राहिली ..एव्हाना सदाचाही आवेश संपून तो घोरू लागलेला ..त्याची अन सवताची कापडं नीट करून..टक्क डोळ्यांनी पडून राहिली होती ..राहून राहून तिला मोठ्याने हंबरडा फोडून रडावेसे वाटत होते ..तिचा बाप दारूनेच गेलेला ..बाप गवंडीकाम करत असे ..दोन्ही पोरी झाल्या म्हणून तो मायला नेहमी शिव्या घाली ...पोरगा होत नाही या दुखा;त त्याने दारू पिण्यास सुरवात केलेली ..तिची माय पण आपण नव-याला मुलगा देवू शकलो नाही या अपराधी भावनेने त्याचे सगळे अत्याचार सहन करी ..ती वयात आली तसे बाप येताजाता उरावर बसून फुकट खातेस असे टोमणे मारू लागलेला ..शेवटी सातवीत शाळा सुटली ..दिवसेंदिवस बापाचे पिणे वाढले ..आधी पैसा .मग आईच्या गळ्यातील डोरले ..पितळी भांडी गेली दारूच्या पायी ..मग भाड्याची खोली सोडून ते लहानग्या खोपटात रहायला आलेले ..आई आसपासच्या सोसायटयात धुणे भांडी करायच्या कामाला जावू लागली ..रखमीला ती मदतनीस म्हणून सोबत नेई ..तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रखमीला किमान दोनचार घरातून जुने कपडे मिळत गेले ..वयात आल्यावर तिला लोकाच्या घरी धुणी भांडी करण्यास जाण्याची लाज वाटू लागली ..जेथे जेथे ती जाई तेथील पुरुष आपल्या बायकांचा डोळा चुकवून रखमीला निरखत असत... हे लक्षात आल्यावर तर ती अजूनच बावरली ..हे लोक चांगल्या नटलेल्या सजलेल्या बायका असून देखील आपल्यासारख्या कडे पाहतात या भावनेने मोहरली देखील ..एकदा एकाने तिच्या आईची पाठ आहे पाहून उगाच तिच्या समोर पाकीट उघडून आतल्या नोटा मोजल्या ..इतक्या नोटा एकरकमी पाहून तिची नजर चळली ..अर्थात ते आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते ..घरी येताच आईने पाठीत एक धपाटा घातला ..म्हणाली ' शेन खायची इच्छा व्हतीय ना ..मग पहिले माझ्याशी रिश्ता तोड ..आपल्या गरिबाकडे हेच एकमात्र धन असते ..तू ते गमावू नकोस ..मी गेली दोन वर्षे हे काम करतेय ..मातर कोणाला भिक घातली नाय ..आन तू चळलीस कार्टे नोटा पाहून " मग आई धाय मोकलून रडली ..तिला पोटाशी धरून बराच वेळ बसून राहिली ..तेव्हापासून रखमीने आईचा मान राखला होता ..तरुण्याचा भार सांभाळत इज्जत जपली होती ..आपण भले कि आपले काम भले याच हिशोबाने ती राबत राहिली ..
पुढे आई कष्टाने खंगत गेली ..टी बी चे निमित्त होऊन एके दिवशी गेली दोन पोरी न दारुडा नवरा उघड्यावर टाकून ..आई गेल्यावर तर बापाने कामावर जाणे देखील सोडून दिलेले .धुणीभांडी करण्याचे काम तिने वारसाहक्काने स्वतःकडे घेतले ..पूर्वी आईच्या जीवावर दारू पिणारा बाप आता लेकीच्या जीवावर दारू पिवू लागला ..लहान बहिण वयात आली तशी तिचीही शाळा सुटली ..उगा लाडे लाडे बोलत नट्टा पट्टा करू लागली ..रखमीने तिला समाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा पिंड वेगळा निघाला .शेवटी एकाचा हात धरून पळून गेली ...तिला शिव्या घालत बापही दारू पिवून एकेदिवशी थंडगार पडला ...
टीप ..कथेतील शिव्या या प्रसंगाला आणि पात्रांना अनुसरून आल्या आहेत ..!
( बाकी पुढील भागात ..अनेक दिवस अनुभवलेल्या सत्यकथा लिहिल्या आहेत ..हे कथाबीज असेच एका सत्यकथेवर आधारित आहे )