Friday, January 16, 2015

विरक्त ? ? ( भाग दोन )


नारायणने पहिले चार दिवस आराम करून नंतर उपचारात सहभाग घेण्यास सुरवात केली ..एरवी नॉर्मल वाटणारा असला तरी व्यक्तिगत समुपदेशनाच्या वेळी आमच्या लक्षात आले की याचे रिफ्लेक्सेस कमी झाले आहेत ..म्हणजे आम्ही जे काही विचारतोय ..सांगतोय ..ते जसेच्या तसे आकलन करून ..त्याच प्रकारे त्याचे उत्तर देणे ..अथवा आम्ही जे सांगतोय ते त्याला समजतेय असे भाव चेहऱ्या दर्शवण्यात तो कमी पडत असे ..अनेकदा आम्ही बोलत असलो तर तो समजते आहे अशा आविर्भावाने नुसताच मान हलवीत राही मात्र नंतर परत आम्ही काय सांगितले ते सांग म्हंटल्यावर कोरा चेहरा करून आमच्याकडे पहात राही..हे दोन भावू ..नारायण लहान आणि दुसरा मोठा ..याने बी एस्सी केलेले ..पुढे देखील शिकायची इच्छा होती ..परंतु वडील गेल्यावर शिकणे कठीण झाले म्हणून ..वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली ...ती करावी लागली ...हातात पैसा येवू लागल्यावर मित्रांच्या नादाने व्यसने देखील सुरु झाली ..वडिलांच्याच रेल्वेत असलेल्या मित्राच्या मुलीशी लग्न ठरले ..पत्नी देखील रेल्वेतच नोकरी करणारी ...संसार व्यवस्थित सुरु झाला मात्र दारूचे ग्रहण हळू हळू लागत गेले ..त्याच काळात एक मुलगा झाला ..पुढे पुढे व्यसन वाढत गेले ..घरातले वागणे बिघडले ..एरवी नम्रपणे वागणारा नारायण दारू प्यायल्यावर घरात मुजोरी करू लागला ..पत्नी अशा वागण्याने कंटाळून काही बोलली की हा भांडणे करी ..शिवीगाळ करी .. घरात ..रोजच्या कटकटी वाढल्या ..याचा सगळा पगार व्यसनात खर्च होऊ लागला ..पत्नीची नोकरी असल्याने घर नीट चालले होते .. तरीही रोजच्या घरातल्या कटकटी ..नोकरी ..घरकाम वगैरे सगळे एकाच वेळी सांभाळणे पत्नीला दिवसेंदिवस कठीण होऊ लागले ..शेवटी तिने माहिती काढून आम्हाला फोन केला होता ..
मानसोपचार तज्ञ डॉ. पानगावकर यांच्याकडे नारायणला दाखवले तेव्हा त्यांनी सांगितले ..दारूमुळे याच्या मेंदूतील न्युरॉन्सची हानी झालीय ..आपल्या मेंदूत कोट्यावधी न्युरॉन्स असतात जे ..वेगवेगळ्या प्रकारची हजारो बारीक सारीक आणि महत्वाचे कामे करत करतात .. आकलन ..स्मरण ..प्रतिक्रिया देणे ..ज्ञानेंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या संवेदना जतन करून त्यांचे विश्लेषण करणे ..वगैरे प्रकारची तसेच ..स्वता:च्या शरीरात निर्माण होणा-या संवेदना अनुभवणे ..थकवा ..आराम ..दमणूक ..तहान -भूक ..वेदना ..या सारख्या संवेदना अनुभवण्याचे तसेच त्या बाबत योग्य प्रतिक्रिया देण्याचे काम हे न्युरोंस अगदी सहजपणे आपल्या नकळत करत असतात ..तसेच आत्मिक भान ..समाजिक भान ..कौटुंबिक भान... या बाबत देखील हे न्युरॉन्स संस्कारा नुसार.. व्यक्तीच्या मुळच्या प्रवृत्ती नुसार ..अथवा अनुभवानुसार वर्तन करण्याची प्रेरणा देत असतात ..दारू अथवा मादक द्रव्यांच्या सेवनामुळे या मज्जातंतूंची हानी होत असते..मुख्य म्हणजे एकदा हानी झालेले मज्जातंतू पुन्हा निर्माण होत नाहीत त्यामुळे अनेक प्रकारची बारीक सारीक ..मात्र महत्वाची कामे मेंदू सहजगत्या करू शकत नाही ...नेमकी कोणाची किती आणि कोणत्या प्रमाणात दारू प्यायले तर ही हानी होईल याचे काही नक्की गणित नसते..काही लोकांच्या बाबतीत अगदी कमी प्रमाणात दारू प्यायल्याने देखील अशी हानी होऊ शकते..नारायणचे देखील तसेच झालेय ..याला गोळ्या देवून आपण काही प्रमाणात मदत करू शकतो ..ज्या योगे त्याचे रिफ्लेक्सेस योग्य होतील ..तरीही सगळे नुकसान भरून काढता येणे सायन्सच्या आवाक्या बाहेरचे आहे ..याने जर नंतर नियमित योगाभ्यास ..प्राणायाम ..ध्यान या सारखे व्यायाम केले तर कदाचित तो पुन्हा पूर्वीसारखा सर्वसाधारण होऊ शकेल ..जरी नुकसान झालेले न्युरॉन्स पुन्हा निर्माण होत नसले तरी ..जे शिल्लक आहेत त्या न्यूरॉन्सना या वाढीव कामाची जवाबदारी देण्याची प्रेरणा प्राणायाम आणि योगाभ्यासा द्वारे शक्य होऊ शकेल ..डॉ.शैलेश पानगावकर यांचे कडे गेल्यावर आम्हाला नेहमी मानसिकते बद्दल अथवा मेंदुंच्या कार्यप्रणाली बाबत काहीतरी नवीन माहिती मिळत असते ..नारायणला डॉक्टरांनी दोन प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या ..त्याला तीन महिने ठेवावे असे आम्ही पत्नीला सुचवले होते ,,मात्र पूर्वी याने अनेक दांड्या मारल्यामुळे याला एका महिन्यापेक्षा जास्त सुट्टी मिळणे कठीण होते..आधीच कामचुकार पणा केल्याने त्याचे डीमोशन झालेले होते नोकरीत ..नोकरीत हा सिनियर असून देखील याला फारसे जवब्दारीचे काम दिले जात नसे ...
एक महिना उपचार घेवून हा बाहेर पडला तेव्हा ..मानसोपचार तज्ञांची औषधे ते सांगेपर्यंत नियमित घेणे ..फॉलोअप ठेवणे ..व्यसनी मित्रांना भेटणे टाळणे वगैरे प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या त्याला ..याने मान जोरजोराने होकारही दिला ..मात्र नव्वद टक्के लोक आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत या अनुभवानुसार घडले ..नारायणने नंतर अजिबात संपर्क केला नाही आमच्याशी ..साधारण पंधरा दिवसात त्याच्या पत्नीचा पुन्हा फोन आला .." वो बहोत पिकर घरके आसपास घूम रहे है..मै आपको फोन करूंगी इस डरसे घरमे नही आ रहे..आप गाडी लेकर आ जावो ..घरके आसपास वो मिल जायेंगे आपको ..उन्हे फिरसे मैत्री में अॅडमिट कर दो " त्या नुसार आम्ही तो राहत होता त्या भागात गेलो ..आसपासच्या दुकानदारांकडे नारायण दिसला का चौकशी केली ..तो जवळच असलेल्या एका दारूच्या दुकानात बसलाय हे समजले ...आम्ही तेथे जावून त्याला दुकानातून उचलून आणले ..आम्ही त्याला घराच्या बाहेर देखील पकडू शकतो याचा त्याला अंदाज नव्हता..त्याला सेंटरला आणल्यावर त्याची झडती घेतली तेव्हा दोन हजार रुपये सापडले त्याच्या .खिशात ..आम्ही पत्नीला ते कळवले तर तिला धक्काच बसला ..म्हणाली दोन नाही जास्त पैसे असायला हवेत त्याच्याकडे ..त्याचा नुकताच पगार झालाय ..तसेच दिवाळीचा बोनस देखील मिळालाय त्याला ..त्याच्या खिश्यात किमान पंचवीस हजार रुपये असायला हवेत ...हे ऐकून आम्ही बुचकळ्यात पडलो ..इतके पैसे याने कोणाला दिले ..की नशेत कोणी काढून घेतले हे समजेना ..त्याला विचारले तर मला आठवत नाही असे उत्तर दिले त्याने ..
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment